मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी शहरात मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेला केंद्र शासनाचा अद्याप कोणताही निधी राज्य शासनाचाही २० टक्के निधी मिळालेला नाही. परिणामी, या योजनेचे लाभार्थी पूर्णपणे मेटाकुटीस असून, बहुतांशी लाभार्थी कर्जबाजारी झाले आहे. २०१८ मध्ये शहरातील ७१० घरकुलाना पंतप्रधान घरकुल योजनेत मंजुरी मिळाली. पैठण नगर पालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेला आतापर्यंत राज्य शासनाकडून पाच कोटी २६ लाखांचा निधी मिळालेला आहे. मिळालेल्या निधीतून पैठण नगर पालिकेने ५६३ लाभार्थींना पहिला हप्ता, ४६१ लाभार्थींना दुसरा हप्ता व ६२ लाभार्थींना तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले होते.
नगर पालिकेने पाच कोटी २६ लाख निधीचे वाटप केले आहे. योजनेनुसार प्रत्येक लाभार्थीच्या केंद्र शासनाचा एक लाख ५० हजार व राज्य शासनाचे एक लाख असा अडीच लाखाचा निधी मिळणार होता.नगर पालिकेला राज्य शासनाचा ८० टक्के निधी मिळाला आहे, मात्र केंद्र शासनाच्या कोणताही निधी आतापर्यंत मिळाला नसल्याने लाभार्थींच्या हप्त्याचे वितरण पूर्णपणे थांबले आहे. नगर पालिकेमार्फत चांगल्या पद्धतीने शहरात पंतप्रधान घरकुल योजना राबविण्यात येत आहे. प्राप्त निधीचे वितरण योग्य पद्धतीने करण्यात यावा या योजनेचा उर्वरित निधीचे मागणी करण्यात आलेली आहे.