Home मुंबई बाळासाहेब आमच्या सोबत ……!

बाळासाहेब आमच्या सोबत ……!

643
0

मुंबई: ‘आज बाळासाहेबांचा आमच्यासाठी जन्मदिवस असून आजही बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. आज जे काही महाराष्ट्राचे, शिवसेनेचं, महाविकास आघाडीचं चाललं आहे त्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो कायम असणार आहे, अशा भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. त्यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांनाअभिवादन केलं.
‘बाळासाहेबांनी जे काही पुण्य केलं त्या पुण्याईवर महाराष्ट्र आणि मराठी माणूस टिकून आहे. याबाबत आम्हाला आनंद आहे,’ असं नमूद करतानाच ‘आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. देशात राज्याचा कारभार नंबर वन आहे. उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. नक्कीच बाळासाहेब जिथं कुठं असतील तिथून ते आनंदात दोन्ही हातांनी आम्हाला आशीर्वाद देत असतील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
उर्मिला मातोंडकर शिवतीर्थावर, बाळासाहेबांबद्दल म्हणाल्या…
‘आमचं प्रत्येक पाऊल बाळासाहेबांनी जो मार्ग दिलाय त्याच दिशेनं जाईल. आमच्यावर कितीही संकट येवो त्या संकटाशी लढण्याची आणि विजयाची प्रेरणा बाळासाहेब देतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पवार, ठाकरे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी पक्षभेद, जातीभेद विसरुन एकत्र यावं असा मंत्र बाळासाहेबांनी दिला होता आणि आज तसं घडत असेल तर बाळासाहेबांना त्याचा आनंद आहे’, असं मत त्यांनी मांडलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटवर प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन करताना एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक करताना फडणवीस यांनी या माध्यमातून शिवसेनेला टोले हाणले आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना व भगवा अजूनही तोच आहे. राजकारणात एखादी भूमिका वेगळी घेतली तर बाळासाहेबांच्या विचारांना छेद दिला असं होतं नाही. असं असेल तर, अनेक पक्षांच्या बाबतीत हेच म्हणावं लागेल. प्रत्येकाला एका प्रसंगी देशासाठी, राज्यासाठी, जनतेसाठी एखादी भूमिका बदलावी लागले, एखादी भूमिका स्विकारावी लागते. आणि स्विकारलेली भूमिका यशस्वी करुन दाखवणे हे कसब असतं आणि शिवसेनेनं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते यशस्वी करुन दाखवलं आहे, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here