Marathwada Sathi

नव्या कृषी कायद्यांचे कौतुक – मोदींना कोणी दिला सल्ला ?

नव्या कृषी कायद्यांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली : सध्या नव्या कृषी कायद्यामुळे नवी दिल्ली मध्ये गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे या कायद्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले जात आहे. भारताच्या नवीन कृषी कायद्यांमध्ये कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकलं जात असल्याची क्षमता दिसत असल्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) करण्यात आलं आहे. मात्र यावेळी त्यांनी नव्या बदलांमुळे ज्यांचं नुकसान होत आहे त्यांना संरक्षण देणंही महत्वाचं आहे असा सल्लाही देण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.

“भारतातील कृषी क्षेत्रात होणाऱ्या विकासाच्या दृष्टीने नवे कृषी कायदे एक महत्वाचं पाऊल असल्याचा आम्हाला विश्वास आहे,” असं आयएमएफचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर गेरी राइस यांनी वॉशिंग्टन येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. ”नव्या बदलांमुळे शेतकरी थेट विक्रेत्यांच्या संपर्कात येणार आहेत. दलाल नसल्याने शेतकऱ्यांना जास्त नफा मिळणार आहे. कार्यक्षमता वाढवणं तसंच ग्रामीण विकासाला दिलेलं हे समर्थन महत्वाचं आहे,” असं आयएमएफने म्हटलं आहे.

“मात्र या नव्या प्रणालीमुळे ज्यांचं नुकसान होऊ शकतं अशा लोकांना सामाजिक सुरक्षा पुरवणं अत्यंत आवश्यक आहे,” असं आयएमएफच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. नव्या बदलांमुळे नुकसान होणाऱ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण करत हे केलं जाऊ शकतं असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.

Exit mobile version