Marathwada Sathi

ग्रामपंचायतींमुळे ४७ लाखांचा खर्च वाचला…. !


मराठवाडा साथी न्यूज
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतीमधील ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीला निवडणुकीसाठी ४० हजार रुपये खर्च येत असून बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे सरकारचे ४७ लाख ६० हजार रुपये वाचले आहेत.कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिनाभरापूर्वी जाहीर झाल्या. अद्याप कोरोनाचे सावट असले तरी ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी पक्षाच्या कामाला लागले होते. कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागात युवा वर्ग आणि ज्येष्ठांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे.
सहा ते सात महिन्यात अनेक समस्यांवर तोडगा निघाला आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यावर युवा वर्गाचा कल ग्रामपंचायतीत काम करण्यासाठी वाढला आहे. अगदी ज्येष्ठांनीही त्यांना मार्गदर्शन करत सहकार्याचा हात दिला. त्यामुळे जिल्हाभरात ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.१८१८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता ३६० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यातील काही ग्रामपंचायती लक्षवेधी ठरल्या आहेत. निवडणुकीमध्ये शासकीय खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो. यामध्ये मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती; वाहतूक, मतदान पेट्यांची ने-आण, भोजन भत्ता, केंद्रावरील स्टेशनरी यासाठी एका ग्रामपंचायतीला सुमारे ४० हजार रुपयांचा खर्च प्रशासनाला करावा लागतो. ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे सुमारे ४७ लाख६०हजार एवढा निवडणूक खर्च वाचला आहे.

Exit mobile version