मराठवाडा साथी
पुणे : राज्यातील ७० साखर कारखान्यांमधून ४० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले असून, यंदा १०८ कोटी लिटर इथेनॉलनिर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याची शक्यता साखर आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आली. साखर कारखान्यांनी अधिकाधिक इथेनॉलनिर्मिती करावी, यासाठी साखर आयुक्तालयाकडून प्रथमच पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांत २० लाख टन साखर उत्पादन कमी करून २५० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.केंद्र सरकारने राज्यातील १३८ साखर कारखान्यांना इथेनॉलनिर्मितीसाठी परवाने दिले आहेत. या कारखान्यांकडून साखरेची मागणी आणि पुरवठय़ात ताळमेळ राखून टप्प्याटप्प्याने दरवर्षी साखरेचे उत्पादन कमी करण्याचे प्रयत्न आहेत. राज्यात साखरेचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होत असल्याने साखर अतिरिक्त होते आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास कारखाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीकडे वळावे, यासाठी साखर आयुक्तालयाने पाच वर्षांचा आराखडा तयार के ला आहे.
२०२०-२१ या हंगामात बी हेवी मोलॅसिस, शुगर सिरप, शुगरकेन ज्यूस यांचा वापर करून इथेनॉलनिर्मितीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. हंगाम संपल्यानंतरही बायोसिरपपासून इथेनॉल तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आतापर्यंत ७० प्रकल्पांमधून ४० कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती झाली असून १०८ कोटी लिटरचे उद्दिष्ट पार होऊ शकेल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.साखर कारखान्यांची इथेनॉलनिर्मितीची क्षमता सुधारण्यासाठी बंद पडलेल्या साखर कारखान्यांमधील इथेनॉलनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ही जबाबदारी सहकार विभागाकडे देण्यात आली आहे. बंद पडलेल्या अनेक साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलनिर्मितीचे प्रकल्प होते. त्या जागेवर पुन्हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या सूचनाही पवार यांनी सहकार विभागाला दिल्या आहेत.