Marathwada Sathi

तीन दिवसांत काेराेनाचे 15 रुग्ण

मनपा चाचणी सेंटर सुरू करणार
छत्रपती संभाजीनगर :शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गवाढीचा धोका वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत १५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी तेरा जण शहराच्या विविध भागांतील आहेत. मागील तीन वर्षांचा अनुभव पाहता मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक प्रमाणात हाेती. त्यामुळे मनपाने कोरोना चाचण्या, प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला धडकी भरवली. तीन लाटांपैकी पहिल्या दोन लाटांत देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळले हाेते. मागील दाेन्ही लाटांमध्ये शहर हिटलिस्टवर होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा संसर्ग वाढू लागल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.दुसरीकडे कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण आढळून येत आहेत. लक्षणे दिसताच चाचणी करा : मनपाने शहरातील प्रमुख खासगी रुग्णालये व मनपा आरोग्य केंद्रांवर आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लक्षणे दिसताच नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, असे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अ‍ँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांतून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. संसर्गवाढीचा धोका लक्षात घेत मेल्ट्रॉन रुग्णालयातील उपचाराची तयारी केली आहे. तसेच काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी स्वतंत्र पथक तैनात करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे. तिन्ही आजारांच्या बाधितांसाठी एकच आरटीपीसीआर चाचणी केली जाते. घाटीतील प्रयाेगशाळेत कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्लू या आजारांची एकाच वेळी चाचणी केली जात आहे.आजारांची लक्षणे सारखीच कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्लू या तिन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. यामुळे संसर्गवाढीचा धोका कमी करता येऊ शकेल.

Exit mobile version