मुंबई । राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई 10 हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचं बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.
रस्ते- पूल – 2635 कोटी
नगर विकास – 300 कोटी
महावितरण ऊर्जा – 239 कोटी
जलसंपदा – 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा – 1000 कोटी
कृषी-शेती-घरासाठी – 5500 कोटी
केंद्राकडून 38 हजार कोटी येणे बाकी
केंद्र सरकारकडून 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईकरता 1065 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. किती दिवस झाले सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारकडून राज्याचे हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याची पत्रे, स्मरणपत्रे देण्यात आलेली आहेत. अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारकडून पाहणीकरिता पथक येते, 2 ते 3 वेळा केंद्रास आठवण केली आहे परंतु अद्याप पथक आले नाही, असेही ठाकरे म्हणाले.