विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांवर नियुक्त करण्याच्या सदस्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लवकरच कळवणार आहेत. तसा निर्णय गुरुवारी दुपारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने झाला.
जून व जुलै २०१९ मध्ये विधान परिषदेवरच्या राज्यपाल नामनियुक्तच्या १२ जागा रिक्त झाल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या जागा भरण्यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षांची मिळून बारा नावे राज्यपालांना कळवावीत असा निर्णय झाला. मात्र नावांवर चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ही नावे राज्यपाल यांना कळवावीत इतकाच ठराव मंजूर करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र लवकरच तयार होईल. तिन्ही पक्ष आपली ४ नावे कळतील, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. परंतु आघाडी सरकारसोबतचे तणावपूर्ण संबंध पाहता राज्यपाल या १२ जागांबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. बैठकीला मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नव्हते. त्यांनी मातोश्री निवासस्थानातून बैठकीत भाग घेतला.
कंगनाला उत्तर ऊर्मिला : काँग्रेसकडून जर अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरचे नाव दिले जाणार नसेल तर शिवसेना तिचे नाव आपल्या कोट्यातून देण्यासाठी विचार करते आहे. अभिनेत्री कंगना रनौतने बॉलीवूडची जी यथेच्छ बदनामी केली होती, त्यासंदर्भातल्या रणनीतीचा भाग म्हणून शिवसेना ऊर्मिलाच्या नावाचा विचार करत आहे.
चर्चित नावे
१. शिवसेना : सचिन अहिर किंवा सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर आणि वरुण देसाई यांची नावे निश्चित आहेत.
२. राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि शिवाजी गर्जे यांची निवड निश्चित मानली जाते.
३. काँग्रेस : सचिन सावंत, नसीम खान, सत्यजित तांबे, ऊर्मिला मातोंडकर यांची नावे असू शकतात.